मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा चीनला फायदा होऊ नये, मनमोहन सिंग यांची टीका

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लडाखसंबंधी वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही टीका केली आहे. पंतप्रधानांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे आपल्या शब्दांचा वापर चीनला भारताचे समर्थन म्हणून वापरण्याची संधी पंतप्रधानांनी देऊ नये असंही ते म्हणाले आहेत. नियंत्रण रेषेवरील समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पर्याय वापरावेत, ते चिघळू नयेत यासाठीही प्रयत्न गरजेचे असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले असून जवानांनी देशासाठी दिलेले बलिदान असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये असेही सिंग यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या सरकारने घेतलेले निर्णय आणि कृतींवरुन भविष्यातील पिढी आपल्याला ओळखणार आहे. जे नेतृत्त्व करत आहेत त्यांच्यावर खांद्यावर कर्तव्य निभावण्याची मोठी जबाबदारी आहे. आणि आपल्या लोकशाहीत ही जबाबदारी पंतप्रधानांवर असते, असे ते म्हणाले.

देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलताना पंतप्रधानांनी शब्द वापरताना नेहमी काळजी घेतली पाहिजे. कारण याचा परिणाम आपल्या रणनीती आणि प्रादेशिक हितांवरही होत असतो. यावेळी चीनला आक्रमकपणा दाखवण्यावरुन आणि भारतीय जमिनीचा ताबा घेण्यावरुन त्यांनी फटकारले आहे. तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. प्रादेशिक अखंडतेशी कोणतीही तडजोड आम्ही करणार नाही असे मनमोहन सिंग यांनी सांगितले आहे.