अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – जिल्हयामध्ये शिल्लक असलेला चारा इतर जिल्हयात जाऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हयातून जिल्हयाबाहेर चारा वाहतूक करण्यास प्रतिबंध आदेश जारी करण्यात येत आहे.
जिल्हयामध्ये माहे सप्टेंबर 2018 अखेर पडलेला पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी असल्याने तसेच यापुढील कालावधीमध्ये पावसाची अशाश्वती निर्माण झाल्याने जिल्हयामध्ये पाणी टंचाई व जनावरांना चारा टंचाई निर्माण झालेली आहे. चा-याची पळवापळवी होऊन त्यातून मोठया प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आणीबाणीच्या प्रकरणी संबंधीतांवर नोटीस बजावणे शक्य नाही. त्यामुळे जिल्हयातून जिल्हाबाहेर चारा वाहतुक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. सदरचा आदेश निर्गमित झाल्यापासून दोन महिन्याच्या कालावधीसाठी अंमलात राहील असेही प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.