खळबळजनक ! ‘परदेशी कन्येपासून राहुल गांधींचा जन्म देशासाठी एक मोठी चुक’, भाजप खा. सुधीर गुप्तांचं वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकारण म्हटलं की वादविवाद हे येतातच. राजकीय वर्तुळात अशा अनेक विवादास्पद विधानांची चर्चा ही होतच असते. अनेक नेते आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत असतात. अशाच भाजपाच्या एका नेत्याने राहुल गांधी यांच्यावर विवादास्पद व्यक्तव्य केले आहे. हे भाजपाचे नेते म्हणजे खासदार सुधीर गुप्ता होय. त्यांच्या वादग्रस्त विधानावर अजून तरी काँग्रेसने पलटवार केलेला नाही.

भाजपा खासदार सुधीर गुप्ता म्हणाले होते की, परदेशी कन्येपासून जन्मलेले राहुल गांधी यांचा जन्म देशासाठी एक मोठी चूक आहे. परदेशातील कन्येपासून जन्मलेल्या मुलाने भारताच्या राजकारणात हस्तक्षेप करावा, हे नीतीला देखील मान्य नाही. अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी यांच्यावर भाष्य केले. खरं तर राहुल गांधी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात ट्विट केले होते. याचा पलटवार म्हणून सुधीर गुप्ता यांनी राहुल गांधींना धारेवर धरले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राहुल गांधींनी केंद्रातील भाजपा सरकारवर प्रश्न उपस्थित केला होता की, या हल्ल्यामुळे सर्वाधिक फायदा कोणाला झाला ? हल्ल्यामागील तपासाचा अहवाल काय होता? हल्ल्याची परवानगी देणाऱ्या सुरक्षेतील चुकीसाठी सरकारने कोणाला जबाबदार ठरविले ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. यावर पलटवार करत सुधीर गुप्ता यांनी प्रश्न उपस्थित केले की, एका इटालियन महिलेसोबत एका भारतीय व्यक्तीचा विवाह केल्यामुळे कोणाला फायदा झाला ? या विवाहाचा निष्कर्ष म्हणजे राहूल आहेत. तसेच, या विवाहाच्या चुकीसाठी कोण जबाबदार आहे ? कॉंग्रेस या चुकीची जबाबदारी स्वत:वर घेणार का ? अशा प्रकारे त्यांनी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.

तसेच सुधीर गुप्ता यांनी स्पष्ट केले की, काँग्रेकडून जो काही एनआरसीचा विरोध होत आहे, हा विरोध ठरवून केला जात आहे. तसेच ते दिल्ली विधानसभा निवडणुकीबद्दल देखील बोलले. निवडणूक म्हटले की यश अपयश या गोष्टी सुरूच असतात असे त्यांनी सांगितलं.