दुर्दैवी ! औरंगाबादमध्ये रेल्वेखाली आल्याने 14 मजूरांचा मृत्यु

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादमधील करमाड येथे रेल्वेरुळावर झोपलेले १४ मजूर मालगाडीखाली सापडून जागीच ठार झाले आहेत. औरंगाबाद -जालना रेल्वे मार्गावर करमाड शिवारात ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता घडली.  हे सर्व मजूर जालनातील एमआयडीसीमधील असल्याची माहिती मिळत आहे. ते सर्व जण औरंगाबाद रेल्वे स्टेशनकडे रेल्वे मार्गाने जात होते.

रप्रांतीयांसाठी औरंगाबादहून रेल्वे सुटणार असल्याची माहिती मिळाल्याने ते रेल्वे मार्गाने पायी जात होते. रेल्वे बंद असल्याचे समजून ते रेल्वे रुळावरच झोपले होते. मात्र, मालगाड्या सुरु आहेत, हे त्यांनी लक्षात घेतले नाही.

सकाळी औरंगाबादहून सुटलेल्या मालगाडीचालकाला रेल्वे रुळावर झोपलेले हे मजूर दिसले नाहीत. झोपेत असल्याने त्यांच्या अंगावरुन रेल्वे गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. तिघे मजूर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.