…तर प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्व देण्यास तयार : रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेगवेगळे राहून राजकीय फायदा होत नाही, एकत्र येणे हीच काळाची गरज आहे. रिपब्लिकन पक्ष एकत्रित येत असतील तर माझी मंत्रीपद सोडण्याचीही तयारी आहे. तसेच आंबेडकरी नेते एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्व देण्याची तयारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दर्शवली आहे.

गटात विभागले गेलेले आंबेडकरी नेते आणि त्यांचे पक्ष नेहमीच चर्चेचा विषय असतात. मोठे पक्ष आंबेडकरी जनतेची मतं मिळवण्यासाठी नेहमीच या नेत्यांचा वापर करून घेतात. त्यामुळे सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र यावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

आंबेडकरी समाजाला एकत्र यावे असे वाटत असेल तर समाजाने नेत्यांवर दबाव आणला पाहिजे. वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही, माझ्या १९९६ चा तिसऱ्या आघाडीचा अनुभव आहे. प्रकाश आंबेडकर यांनी हातमिळवणी केली तर पुढल्या पाच वर्षातील राजकीय भूमिका ठरवू अशी ऑफर आठवलेंनी आंबेडकरांना दिली.

अनुसूचित जाती-जमातीच्या हितासाठी ज्यांच्याकडून राजकीय लाभ मिळेल त्यांच्यासोबत मी आणि प्रकाश आंबेडकर जाऊ अशी माझी भूमिका आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांनी आधी एकत्र यावे. निर्णय घेताना बहुमताने, एकमताने निर्णय घेऊ. दलित समाजातील विचारवंतांनी यासाठी प्रयत्न आणि मार्गदर्शन करावे, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलं.