भाजपच्या IT सेलला व्देष पसरवण्यापासून थांबवा, ‘या’ अभिनेत्रीची PM मोदींवर टीका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर करून घेतल्यानंतर अनेक राज्यांमध्ये जाळपोळ व्हायला सुरुवात झाली. अनेक लोकांनी रस्त्यावर उतरत या कायद्याला विरोध करायला सुरुवात केली यामुळे अनेक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पहायला मिळाला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. या ट्विटला मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी तुम्हाला देशात शांतता हवी असेल तर आधी भाजपच्या आयटी सेलच्या ट्विटर हॅण्डलपासून सामान्य लोकांना लांब राहण्यास सांगा असे म्हणत मोदींना रिट्विट केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये रेणुका शहाणे म्हणतात, सर आधी आपल्या जनतेला तुमच्या ट्विटर हँडलरपासून दूर राहण्यास सांगा कारण त्यांच्याद्वारे खोटी माहिती आणि अफवा पसरवण्यात येतात म्हणून देशातील शांतात, बंधुता आणि एकात्मतेला धोका निर्माण होत आहे. असे म्हणत रेणुका शहाणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

काय म्हंटलय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये
कधीही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन सर्वसामान्यांच्या जीवनात अडथळा निर्माण करणे हे आपल्या तत्वात बसत नाही असं त्यांनी सांगितलं होतं. तसेच आपण सर्वांनी एकत्रितपणे भारताच्या विकासासाठी आणि प्रत्येक भारतीय, विशेषतः गरीब, वंचित आणि शोषितांच्या सक्षमीकरणासाठी काम करणं ही काळाची गरज आहे. आम्ही स्वार्थासाठी स्वारस्य असलेल्या गटांना आमचे विभाजन करण्यास आणि त्रास निर्माण करण्यास थारा देऊ शकत नाही. शांतता, ऐक्य आणि बंधुता टिकवण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवा व इतर खोटेपणापासून दूर रहावे तसेच विधेयकावरुन हिंसक आंदोलन करणे हे दुर्दैवी आणि अत्यंत त्रासदायक असल्याचे नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी देशाच्या अनेक भागांमध्ये जाळपोळ व्हायला सुरुवात झाली होती आणि हिंसक वळण लागल्याचे दिसून आले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/