दिल्ली विधानसभा : भाजपसोबत युती न झाल्यास RPI 6 जागांवर स्वबळावर लढेल, रामदास आठवलेंनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच भाजपकडे चार जागांची मागणी केली आहे. भाजपासोबत युती न झाल्यास सहा जागांवर आरपीआय स्वबळावर लढेल, असा निर्धार आठवलेंनी केला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, भाजपानं चार जागा न दिल्यास आरपीआय सहा जागांवर स्वबळावर लढेल आणि इतर जागांवर भाजपाला समर्थन देईल.

आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलतांना आठवले म्हणाले की, आरपीआय दिल्ली विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे आता भाजपा नेमकं आता काय करणार यावर लक्ष लागले आहे. निवडणूक लढण्यासाठी आमच्याकडे योग्य उमेदवार असल्याचंदेखील आठवले म्हणाले आहे. ही बातचीत निष्फळ ठरल्यास पक्ष सहा जागांवर उमेदवार देईल आणि इतर जागांवर भाजपाच्या पाठिशी उभा राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ११ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या. तर भाजपाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यंदा दिल्लीत भाजपाचं सरकार येईल असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला. दिल्लीतलं वातावरण भाजपाच्या बाजूनं असून मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली कामं लक्षात घेऊन मतदान करतील, असं आठवलेंनी म्हटलं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/