हृदयद्रावक ! अंगणात झोपलेल्या महिलांच्या अंगावर कोसळली भिंत, तिघींचा मृत्यू 

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगलीतील मोही तालुका खानापूर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. उकाड्यापासून हैराण झालेल्या महिलांना आंगणात झोपणं जीवावर बेतलं. झोपलेल्या या महिलांच्या अंगावर कंपाऊंडची भिंत कोसळली. या घटनेत तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हौसाबाई विष्णू खंदारे (वय ८० वर्ष), कमल नामदेव जाधव (वय ५० वर्ष), सोनाबाई विष्णू खंदारे (वय ५० वर्ष) अशी मृत महिलांची नावे आहेत. तर सावित्री तुळशीराम हसबे (वय ४५ वर्ष) या जखमी आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून सर्वजण आपल्या पत्र्याच्या घरासमोरील पटांगणात झोपले होते. झोपण्याच्या जागी डोक्याकडील बाजूला शेजारच्या घराच्या कम्पाऊंडची भिंत होती. रात्री अचानक पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ही भिंत झोपलेल्यांच्या अंगावर कोसळली. यात भिंतीच्या शेजारी झोपलेल्या तिघींच्या डोक्यावर भिंत कोसळली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, सावित्री तुळशीराम हसबे (वय ४५ वर्ष) या जखमी आहेत. त्यांना करंजेमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह करंजे इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.