एका मंत्र्यांनं अफवेमुळं राजीनामा दिलाय का ?, राऊतांचा मोदी सरकारला ‘सवाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेतील मंजुरीनंतर आज राज्यसभेत मांडली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधेयक मांडल्यानंतर विधेयकावर चर्चा करताना विरोधी पक्ष आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसून आले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील विधेयकावरून सरकारला धारेवर धरत काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्यारुनही राऊत यांनी मोदींना टोला लगावला.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क व सुरक्षा) दर हमी दोन विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत मांडली. या विधेयकांवर चर्चा करताना विरोधी पक्षांच्या खासदारांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली भुमिका मांडली. ते म्हणाले, देशातील 70 टक्के लोक शेतीशी जोडले गेलेले आहेत. संपूर्ण लॉकडाऊच्या काळात शेतकरी शेतात काम करत होता. ही विधेयके मंजुर झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार का ? त्यानंतर यापुढे देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची ग्वाही सरकार देणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संजय राऊत पुढे म्हणाले, या विधेयकांना शेतकऱ्यांचा विरोध आहे. तर पूर्ण देशात याला विरोध का होत नाही ? जर देशभरात विरोध होत नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की, विधेयकासंदर्भात काही गैरसमजही आहेत. सरकारनं हे गैरसमज दूर करायला हवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, विधेयकाबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे माला विचारायचं की, अफवेमुळेच एका मंत्र्यानं राजीनामा दिला का ? असा सवाल संजय राऊत यांनी मोदी सरकारला विचारला.

ही दोन्ही कायदे ऐतिहासिक असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणतील. शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कोठेही मुक्तपणे विकू शकतील. मी शेतकऱ्यांना आश्वासित करतो की ही विधेयके एमएसपीशी संबंधित नाहीत, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी विधेयक मांडताना सांगितले.