… मग काय ‘भाभीजी के पापड’ खाऊन ‘कोरोना’ जातो का ? राऊतांचा राज्यसभेत हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र कोरोनाची परिस्थिती हातळ्यात अपयशी ठरला अशी टीका करणाऱ्यांचा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत चांगलाच समाचार घेतला. राज्यसभेत बोलताना संजय राऊत म्हणाले, माझी आई आणि भावालाही कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात अनेक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. धारावीतील परिस्थिती नियंत्रणात असून जागतिक आरोग्य संघटनेने देखील याची दखल घेत मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या प्रत्येकाने या गोष्टी लक्षात घ्याव्यात असे राऊत यांनी खडसावले.

कोविडवर आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर झालेल्या चर्चेत संजय राऊत बोलत होते. संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावताना म्हणाले, ‘भाभीजी पापड’ खाऊन बरे होतात का ? असा सवाल त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी हे पापड लाँच करत यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते असा दावा केला होता. यानंतर काही दिवसांनी हेच मंत्री स्वत: कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले. संजय राऊत म्हणाले, मला सदस्यांना विचारायचं आहे की एवढे लोक कसे काय बरे झाले ? ते काय ‘भाभाजी के पापड’ खाऊन बरे झाले का ? ही राजकीय लढाई नसून लोकांचे जीव वाचवण्याची लढाई असल्याचे राऊत म्हणाले.

दरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहात देशभरातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. लॉकडाऊनमुळे 14 ते 19 लाख केसेस कमी करता आल्या. तसेच 37 ते 38 हजार जीव आपल्याला वाचवता आले, असे त्यांनी सांगितले. भारतात प्रति 10 लाखांमागे सर्वात कमी मृत्यू असल्याचे देखील केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. दिल्लीत महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती विषयीही टीका झाली. देशात सर्वाधिक कोरोना केसेस सध्या महाराष्ट्रात आहेत. बुधवारी राज्यात 23 हजार 365 नवी रुग्णांची नोंद झाली, तर 474 मृत्यू झाले. महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11.21 लाख झाली आहे.