राजकिय चर्चेला उधाण ! निवडणूकीपुर्वी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले आ. शिवेंद्रसिंह राजे यांनी घेतली शरद पवार, अजित पवार यांची भेट

सातारा : पोलीसनामा ऑनालाइन – विधानसभा निवडणुकीपूर्वी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी आज सातारा येथील विश्रामगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सध्या शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत. मात्र, अजूनही त्यांच्या मनातून राष्ट्रवादी सोबतचे प्रेम कमी झालेले नाही. त्यांच्या या भेटीमुळे साताऱ्यामध्ये उलट-सुटल चर्चा सुरु झाली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर एका साखर कारखानाच्या कार्यक्रमात शरद पवार आणि शिवेंद्रसिंहराजे यांची भेट झाली होती त्यावेळी मकरंद पाटील यांनी मध्यस्थी करत शिवेंद्र बाबांना पुन्हा आपल्याकडे घ्या, अशी विनंती केली होती. आज शिवेंद्रसिंहराजे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. ही भेट राजकीय भेट होती की शहरातील सर्वसामान्य प्रश्नासंदर्भात याबाबत साताऱ्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आपण शहरातील विविध प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही कधीही विकास कामांबाबत अडथळा आणत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे शहरातील मेडिकल कॉलेजचा प्रश्न त्यासोबतच एमआयडीसी, अर्धवट राहिलेलं कास धरणाचे काम आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात निवेदन अजित पवार यांना दिले असल्याची माहिती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. मात्र, दरम्यानच्या काळात अजित पवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये राजकीय चर्चा झालेली असू शकते हे देखील नाकारता येऊ शकत नाही.

सातारा महत्त्वाचे का ?
राज्यासाठी सातारा खूप महत्त्वाचे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्राचे राजकीय केंद्र सातारा ठरले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या मतदारसंघातूनच निवडणूक लढवतात. त्यामध्ये छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना उमेदवारी दिली जाते. मात्र, लोकसभेला जिंकलेल्या उदयनराजे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर विधानसभेच्या तोंडावर शिवेंद्रसिंह राजे हे देखील भाजपमध्ये दाखल झाले. दोन्ही निवडणुका एकाचवेळी झाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या निडणुकीत प्रचाराची धुरा स्वत: शरद पवार यांनी सांभाळली. सर्व ताकद पणाला लावून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. अखेर या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला तर शिवेंद्रराजे निवडून आले.