मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल याबाबत पवारांची शंकाच

सातारा : पोलिसनामा ऑनलाईन – पाटणमध्ये आज राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य केलं आहे. राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण लागू केले आहे. मात्र, हे मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका आहे, अशी पहिली प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे  मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरु झाल्याचं दिसत आहे.
मराठा समाजासाठी भाजप सरकराने 16 टक्केआरक्षण लागू केले. यानंतर मराठा आरक्षणाबाबत आव्हान देण्यात आले. आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने  सुनावणीदरम्यान, मराठा आरक्षण जरी लागू झाले तरी मराठा जात प्रमाणपत्र देऊ नका किंवा त्याचे वाटप करु नका, असा स्पष्ट आदेश दिला आहे. भाजप सरकारला हा मोठा झटका आहे.
या सगळ्यानंतर आता शरद पवार यांनी आरक्षणाबाबत शंका व्यक्त केली आहे. ‘राज्यात भाजप सरकारकडून मराठा आरक्षण दिले गेले आहे, ते न्यायालयात किती टिकेल याबाबत शंका आहे असं म्हटलं आहे. त्यांनी 102 व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले. या तरतुदीतील मुद्दे सरकारने लक्षात घेतले नसावेत, अशी शंका पवार यांनी यावेळी उपस्थित केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
आज साताऱ्यातील पाटणमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी यांच्याकडून गांधी कुटुंबावर होत असलेल्या टीकेला पवारांनी जोरदार उत्तर दिले आहे. दरम्यान त्यांनी गांधी कुटुंबातील पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या देशासाठीच्या त्यागाचे उदाहरण देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे कौतुक केले.