…म्हणून आम्हाला जनतेनं खाली खेचलं : शरद पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जनतेमुळे देशातील लोकशाही मजबूत असल्याचे सांगत १९७७ साली आम्ही चूक केली. त्यामुळे आम्हाला जनतेने खाली खेचले. नंतर दोनच वर्षांनी पुन्हा जनतेने इंदिरा गांधी यांच्यावर विश्वास ठेवून एकहाती बहुमत दिले असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. १९७७ च्या इंदिरा सरकारप्रमाणे वागत आहेत असेही पवारांनी म्हटले.
पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात आम्हाला संधी दिली आणि आता नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. नवीन नेतृत्त्व पुढे आणलं पाहिजे असे सांगत संग्राम जगताप यांच्या उमेदवारीचे समर्थन केले.

मोदी सातत्याने म्हणत आहेत की, शरद पवार चांगले व्यक्ती आहेत. पण त्यांच्या घरात कलह सुरू आहे. पवारांचा पुतण्या त्यांच्या हाताबाहेर गेला. पण माझ्या घरातील प्रश्नांवर त्यांना काय करायचे आहे असा सवाल पवारांनी विचारला. मोदींच्या टीकेवर विचार करताना माझ्या लक्षात आले की मी माझी पत्नी, मुलगी, जावाई आणि नातवंडासोबत राहतो. पण त्यांना यापैकी कोणीच नाही. मोदींना दुसऱ्याच्या घरात काय चालले आहे हे पाहण्याची काय गरज आहे. यावर खालच्या पातळीवर यायचे नसल्याने मी अधिक काही बोलणार नाही असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.