शिवसेनेच्या आमदारांचं ‘मढ’ बीचवर ‘खिच मेरी फोटो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेले मतभेद अगदी टोकाला गेले आहेत. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावरुन आडून बसल्याने राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. तसेच घोडेबाजारात आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेने आपल्या नवनिर्वाचीत आमदारांना सुरक्षीत स्थळी पाठवले आहे. तर काँग्रेसने देखील आपल्या आमदारांना सुरक्षीत स्थळी पाठवले आहे.

राज्यातील सत्तास्थापनेवरून मागील अनेक दिवसांपासून घडामोडी सुरु आहेत. शुक्रवारी मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला होता. शुक्रवारी सत्तास्थापनेबाबत भाजप दावा करणार अशी शक्यता असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर सगळ्यांचे लक्ष राजभवनाकडे लागले आहे. सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटताना दिसत नाही. त्यामुळे आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेना आमदारांचा मढ बीचवर ‘एन्जॉय’
शिवसेनेचे आमदार मढ बीचवर पोहोचले असून ते एन्जॉय करताना दिसत आहेत. प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील सध्या बीचवर आनंद घेत आहेत. आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत सेल्फीही घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, शिवसेनेने शुक्रवारी आपल्या आमदारांना रंगशारदा हॉटेलमधून बाहेर काढून मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये हलवले. रिट्रीट हॉटेल हे थ्री स्टार रिसॉर्ट असून सगळ्या आमदारांना एकत्रितपणे बैठक घेता येईल. या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व आमदारांची एकत्र बैठक घेऊ शकतात अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल
शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे दिल्लीला गेले आहेत. आयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने काँग्रेस कर्यसमितीची बैठक बोलवली आहे. हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीनंतर राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती सोनिया गांधी यांना देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता काँग्रेस, शिवसेनेला समर्थन देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Visit : Policenama.com