औरंगाबाद शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपासून चोरट्यांनी औरंगाबाद शहरात धुमाकूळ घातला आहे. अत्यंत वर्दळीच्या आणि शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुलमंडी येथील जेथलिया टॉवर्स अपार्टमेंटमधील ४ घरे फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. ही घटना गुरुवारी २७ डिसेंबर सायंकाळी साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान घडली. चारपैकी तीन घरांची कुलपे न तुटल्याने चोरट्यांचा डाव फसला. एक घर काही दिवसांपासून रिकामे असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.
मध्यवर्ती आणि वर्दळीचा परिसर म्हणून गुलमंडीची ओळख आहे. याच भागात प्रमुख बाजारपेठ असल्याने रात्री उशिरापर्यंत या भागातील दुकाने चालू असतात. त्यामुळे नागरिकांची या भागात सतत वर्दळ असते. गुलमंडीवर जेथलिया टॉवर्स ही ६ मजली इमारत असून यात २४ फ्लॅट आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसात या दरम्यान चोरट्याने तिसऱ्या मजल्यावरील श्यामसुंदर लढ्ढा, चौथ्या मजल्यावरील दीपल लढ्ढा, संजय जयस्वाल आणि पाचव्या मजल्यावरील प्रवीण भुमा यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु चारही घरांच्या दरवाजांना सेंट्रल लॉक असल्याने ते तुटले नाही. त्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
तिसऱ्या मजल्यावरील श्यामसुंदर लढ्ढा यांच्या घराच्या बेडरूमचे लॉक न तुटल्याने चोरट्यांना निराश व्हावे लागले. दरम्यान, जेथलिया टॉवर्स येथील चारही घरांतून एकही वस्तू चोरीला न गेल्याने रहिवाशांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे टाळले. जेथलिया टॉवर्स येथील तळमजल्यावर भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, नगरसेवक राजू तनवाणी, बंटी तनवाणी यांचे संपर्क कार्यालय आहे. अत्यंत वर्दळीच्या जेथलिया टॉवर्समधील चार घरे फोडण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरातील रहिवाशांत खळबळ उडाली आहे. सगळ्यांना आपल्या सुरक्षेची काळजी पडली आहे अश्या वेळेस पोलिसयंत्रणा कितपत तत्पर होईल याकडे शहरवासियांचं लक्ष असेल.