‘लोकल सुरू करा किंवा मुंबईच्या डबेवाल्यांना एवढं अनुदान द्या’, मोदी सरकारकडे मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनामुळं देशात 19 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळं गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या डबेवाल्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. रोजगार नसल्यानं त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. याच पार्श्वभूमीवर डबेवाल्यांनी केंद्र सरकारकडे अनुदानाची मागणी केली आहे. राज्यात अनलॉक होत असून टप्प्या टप्प्यानं अनेक गोष्टी खुल्या केल्या जात आहेत. एसटी बस सेवा देखील सुरू झाली आहे. मुंबईतील लोकल मात्र अद्यापही बंद आहे. डबेवाल्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

विविध कार्यालयात डबे पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांच्या प्रवासाचं लोकल ट्रेन हे माध्यम आहे. लोकल सध्या बंद आहे. त्यामुळं याचा मोठा फटका त्यांना बसला आहे. कारण आता सारं काही ठप्प झालं आहे. मुंबई आता पूर्वपदावर येत आहे. शासकीय, निमशासकीय तसंच कार्पोरेट कार्यालये चालू होत आहेत. या कार्यालयात चाकरमानी कामावर रूजू होताना दिसत आहेत. हे चाकरमानी आता आपल्या डबेवाल्यांना फोन करून डबे पोहोचवण्याची मागणी करत आहे. परंतु सध्या लोकलसेवा मात्र बंद आहे. जोवर ही सेवा सुरू होत नाही तोवर डबेवाले काहीच करू शकत नाही.

सर्व स्थितीचा विचार करता आता मुंबई डबेवाला असोसिएशननं केंद्र सरकारकडे अनुदानाची मागणी केली आहे. मुंबईतील लोकल सेवा बहाल करण्यात यावी. अथवा डबेवाल्यांचे काम ही अत्यावश्यक सेवा मानून त्यांना लोकलनं प्रवास करण्याची मुभा द्यावी. दोन्हीही गोष्टी जर शक्य नसतील तर महिन्याला किमान 3 हजार रुपये अनुदान द्या अशी मागणी असोसिएशननं केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितलं की, लोकल ही जशी मुंबईची लाईफलाईन आहे तशीच ती डबेवाल्यांचीही लाईफलाईन आहे. जोपर्यंत ती सुरू होत नाही तोपर्यंत डबेवाल्यांना आपली सेवा देणं शक्य नाही.