COVID-19 : पाकिस्तान, नेपाळसह ‘या’ 5 देशालगतच्या सीमांमधून भारतात ‘एन्ट्री’ बंद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याचा धोका ओळखून शनिवारी (14 मार्च) एक आदेश जारी करून पाकिस्तानलगतच्या सीमेवरील सर्व रस्ते 16 मार्चच्या मध्यरात्रीपासून अनिश्चित काळासाठी बंद केले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमांलगतचे बहुतांश रस्ते सुद्धा 15 मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद केले आहेत.

काही रस्ते लोकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. या रस्त्यांद्वारे प्रवास करणार्‍या प्रवाशांची वैद्यकीय चाचणी केली जाईल. गृह मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, कोविड-19 चा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रकोप संपूर्ण जगासह भारतातसुद्धा वाढत आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या पॉझिटीव्ह प्रकरणांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे. तर जगभरात हा आकडा 154359 झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात पाच हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत यामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची आतापर्यंतची सर्वात जास्त प्रकरणे समोर आली आहेत. येथे कोरोना वायरसची 31 रूग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर देशात हा आकडा 101 झाला आहे.

महाराष्ट्राच्या मुंबई, पुणे, नागपुर आणि यवतमाळमध्ये शनिवारी कोरोना व्हायरसची नवी प्रकरणे समोर आल्यानंतर एकुण रूग्णांची संख्या 31 झाली आहे. कोरोना व्हायरसचे मुंबईत 8, पुण्यात 15, नागपुरात 4, यवतमाळमध्ये 2, ठाणे आणि अहमदनगरमध्ये एक-एक प्रकरण समोर आले आहे. यास महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहे. ब्लिक हेल्थ डिपार्टमेंटने सुद्धा 31 रूग्ण असल्याचे म्हटले आहे.