पाकिस्तानात पुन्हा एकदा हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतरण, तक्रारीनंतर पोलिसांनीही दिला त्रास

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांचा विशेषत: हिंदूंचा छळ थांबण्याचे नाव घेत नाही. हिंसाचार आणि जबरदस्तीने धर्मांतराच्या बातम्या सतत समोर येत आहेत. सोमवारीही अशी दोन प्रकरणे नोंदविली गेली आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हिंदू मुलींचे अपहरण करून जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर करण्यात आले. एएनआय च्या मते, सिंध प्रांतातील मीरपूर खास जिल्ह्यातील रइस नेहाल खान गावात राजसिंग कोहलीची पंधरा वर्षीय मुलगी सुनत्रा हीचे सशस्त्र लोकांनी अपहरण केले. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले असता तिथेही त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. दिवसभर प्रतीक्षा केल्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याच दिवशी 19 वर्षीय भगवंती कोहलीचेही अपहरण केले गेले. सिंध प्रांतातील मीरपूर खास जिल्ह्यातील हाजी सईद बुरगाडी गावात तिचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. कुटुंबियांच्या मते भगवंती विवाहित आहे. धर्मांतरण झाल्याने त्यांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. भगवंतीच्या नातेवाइकांनी मुलीच्या परतीसाठी प्रदर्शनही केले. अपहरणकर्त्यांनी पोलिस ठाण्यात मुलीचे इस्लाम धर्म स्वीकारल्या बाबतचे प्रमाणपत्र दिले. दरम्यान, हिंदू आणि इतर अल्पसंख्याक सतत मुस्लिम आणि तेथील प्रशासनाच्या छळाला बळी पडत आहेत.

दुसर्‍या एका घटनेत भील (हिंदू) समाजातील लोकांवर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. पुरुष, महिला आणि मुलांना कठोर मारहाण केली गेली. त्यांची घरे उद्ध्वस्त झाली. ही घटना सिंध प्रांतातीलच थारपारकर जिल्ह्यातील बरमालियो गावची आहे. या संपूर्ण भागातच हिंदूंवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यांच्याकडे खाण्यासाठी अन्न नाही, पिण्यास पाणी नाही आणि राहण्यासाठी घरे नाहीत.