‘सर्वोच्च’ निर्णय ! वडिलांच्या ‘प्रॉपर्टी’मध्ये मुलीचा कोणत्याही परिस्थितीत अर्धा ‘हिस्सा’ असणार, सुप्रीम कोर्टानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या वडिलांच्या संपत्तीत मुलांप्रमाणे मुलीलाही वाटा मिळावा या मुद्यावरच बराच वाद सुरु होता. मात्र, आता अखेर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आपला ऐतिहासिक निर्णय देत मोहोर उमटवली आहे. यापुढे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान वाटा मिळेल असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

आपल्या पित्याच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना भावा प्रमाणे समान वाटा मिळेल, असे 2005 मध्ये अधिनियमित करण्यात आले होते. त्यानुसार आता मुलगा आणि मुलगी या दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये समान हक्क मिळणार आहे. मात्र, हा कायदा 2005 मध्ये लागू झाला होता. त्यामुळे 2005 पूर्वी वडिलांचे निधन झाले असेल तर त्याचा लाभ मुलींना मिळणार की नाही हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र, आज न्यायमुर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल असा एतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
वडिलांच्या मालमत्तेचे वाटप करताना वडिल हयात असतील किंवा त्यांचे निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळाला पाहिजे, असं स्पष्ट केलं आहे. जस्टिस मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मुलीला समान वाटा हा दिलाच पाहिजे. मुलाचे लग्न होत नाही तोपर्यंत तो मुलगा असतो. पण, मुलगी ही कायम मुलगीच असते.

मुलीला 1996 च्या कायद्यानुसार हिस्सा मिळणार होता. मात्र 2005 मध्ये केंद्र सरकारने यामध्ये बदल केला. यात 2005 सालानंतर ज्या मुली जन्मतील त्या मुलींना समान हिस्सा मिळणार असा बदल करण्यात आला. आता हा मुद्दा कायमचा वगळण्यात आला आहे. त्यामुळे वडिलांच्या मालमत्तेत आता मुली हक्काने आपला वाटा मागू शकतात.

पूर्वी काय होत नियम ?
मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळण्याबाबत हिंदू वारसा हक्क कायदा 1956 हा कायदा होता. त्यानुसार वडिलांच्या संपत्तीत मुलीला वगळून वाटणी होत होती. त्यानंतर वडिलांना जो वाटा मिळाला असेल त्यांची पुन्हा मुलांच्या संख्येनुसार वाटणी होत होती आमि त्यात सर्व मुलींना समान हिस्सा मिळत होता. 1994 मध्ये कायद्यात चार राज्यात बदल करण्यात आला. 1994 नंतर ज्या मुलींचा जन्म झाला आहे, त्यांना वडिलांच्या संपत्तीत समान हिस्सा मिळेल, अशी तरतूद करण्यात आली होती, आणि ज्या मुलींची लग्न 1994 सालच्या आधी झालं आहे. आता या संपूर्ण कायद्यात बदल करण्यात आला असून मुलीला समान वाटा मिळणार आहे.