भारतीय संघाची पुलवामातील शहिदांना अनोखी ‘आदरांजली’ 

रांची : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसरा सामना रांची येथे होत आहे. या सामन्यातून पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना भारतीय संघाने वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.

भारतीय संघातील सर्व खेळाडू या सामन्यात खेळताना आर्मी कॅप घालणार आहेत. माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने सर्व खेळाडूंना सामना सुरु होण्याआधी कॅप्सचे वाटप केले. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन याचा व्हिडीओ टाकला आहे.

बीसीसीआयने केलेल्या ट्विटमध्ये ‘पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने आज भारतीय खेळाडू आर्मी कॅप घालून मैदानात उतरणार आहेत. भारतीयांनी शहीद जवनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि नातेवाईकांसाठीच्या मदतनिधीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात देणगी द्यावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे’ असं म्हटलं आहे.

आर्मीच्या कॅप्स घातल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. सामन्यासाठी नाणे फेकीसाठी येताना विराट कोहली हीच आर्मी कॅप घातली होती. विराटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच समान्यांच्या मालिकेमध्ये भारताने २ – ० अशी आघाडी मिळवली आहे.