‘आदर्श’ मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींकडून सर्व रेकॉर्डब्रेक ; राज्यात नेमले ‘एवढे’ उप मुख्यमंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्रप्रदेशमध्ये विधानसभेच्या देखील निवडणूका झाल्या होत्या. त्यात जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने घवघवीत यश मिळवत १७५ पैकी १५२ जागा जिंकत तेलगू देसमचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकहिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. जगनमोहन यांनी स्वतःच्या कार्यालयातील पहिल्याच दिवशी वृद्धांची पेन्शन वाढवण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक महत्वाचा निर्णय घेत आपण आदर्श मुख्यमंत्री असल्याचे दाखवून दिले.

त्यांनी आणखी एक धाडसी निर्णय घेत राज्यात पाच उपमुख्यमंत्र्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्व नवनिर्वाचित आमदारांची त्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपला हा निर्णय त्यांना सांगितला. त्याचबरोबर शनिवारी २५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. त्याचप्रमाणे पुन्हा अडीच वर्षांनी ते आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत. यावेळी त्यांनी सांगितले कि, मागील सरकार आणि आताचे सरकार यातील फरक लोकांना जाणवायला हवा. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

दरम्यान, या पाच उपमुख्यमंत्र्यांमध्ये विविध जातिसमूहाचे आमदार असतील. यात अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्यांक आणि कापू समुदायातील आमदार असतील. त्यामुळे त्यांनी स्थानिक पातळीवर काम करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. भारतात पहिल्यांदा कोणत्याही राज्यात पाच उपमुख्यमंत्री असतील. यापूर्वी असे कधीही घडलेले नाही.