‘बॅनर’ लावून ‘त्यांनी’ वाहिली पळून गेलेल्या मुलीला ‘श्रद्धांजली’ !

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पळून गेलेल्या मुलीविरोधात वडिलांनीच बॅनर लावून ती स्वर्गवासी झाल्याचे जाहीर करत तिला श्रद्धांजली वाहिली. मुलगी घरातून पळून गेल्याने बेअब्रु झाल्याच्या भावनेतून मुलीच्या कुटुंबियांमध्ये आहे.  त्यातूनच हा बॅनर लावण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वीच मुलगी घरातून पळून गेली आणि तिने दुसऱ्या जातीच्या मुलाशी विवाह केल्याची बाब समोर आल्याने नुकतीच गडचिरोलीतल्या कुटुंबाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली होती. आता कोल्हापूरात पळून गेलेली मुलगी आपल्यासाठी मेली असे बॅनर तिच्या वडिलांनी लावले आहे.

या मुलीचे वडिल घडल्या प्रकाराबाबत काहीही बोलायला तयार नाही. त्यांनी आपल्या भावना बॅनर लावूनच व्यक्त केल्या आहेत. या बॅनरमध्ये श्रद्धांजली असे असे नाव देऊन पळून गेलेल्या मुलीचा फोटो त्यावर लावला आहे. त्या फोटोवर काळ्या रंगाने फुल्या मारल्या व फोटो खाली कै. असा उल्लेख करुन तिचे नाव लिहिले आहे. बॅनरवर उजव्या बाजूला शोकाकुल -आत्मक्लेश असे नाव देऊन एक संदेश लिहिला आहे. त्यात ‘‘बाळ तू जन्माला येताना संधीवाताचा आजार तुझ्या आईला घेऊन आलीस त्या वेदना सहन करीत ज्या आईने तुझे सर्व हट्ट, लाड, पुरवीत मोठे केले ती दुदैवी आई.

आज अखेर तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला. परंतु या पुढील तुझ्या आयुष्यात आनंद सुख देणे असमर्थ ठरला म्हणून तू सोडून गेलीस हा काळा दिवस पाहण्यासाठी जीवंत असलेला असा हा कमनशिबी बाप़..’’
त्या खाली बोध म्हणून ‘‘हे वाचून अशा वागणाऱ्या मुलीच्या मनाचे परिवर्तन होऊन आपल्या आईवडिलांचा विश्वासघात करणार नाहीत ही अपेक्षा़..’’
या बॅनरची चर्चा झाल्यानंतर हे बॅनर उतरविण्यात आले.