दुष्काळ इफेक्ट ! सामान्यांच्या ताटातल्या डाळींचे भाव कडाडले, बजेटवर परिणाम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अगदी सामान्यांपासून ते उच्चभ्रू वर्गाच्या आहारातील प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून वापरल्या जाणाऱ्या डाळींचे भाव सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. मागील दीड महिन्यांतच क्विंटलमागे २ हजार रुपयांनी तूरडाळ घाऊक बाजारात वाढली आहे. त्यामुळे तूर डाळीचे भाव ७० ते ७२ रुपये प्रतिकिलोवरून ८० ते ८५ रुपये किलो झाला आहे.  त्यामुळे सामान्यांपासून ते उच्च वर्गातील गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडले आहे.

पुण्यातील डाळीचे घाऊक व्यापारी नितीन नहार यांनी सांगितले की, राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. मागील वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांना तुर, मुग या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेता आले नाही.राज्यात विदर्भ, मराठवाडा हा तूर उत्पादक पट्टा आहे. तर शेजारीच कर्नाटकातही तूरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र राज्यातील तूर उत्पादक पट्ट्यात आणि कर्नाटकात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तूरीचे उत्पादन थेट ४० टक्क्यांनी कमी झाले. हीत बाब मुगाच्या बाबतीतही आहे. राज्यात मुग पिकविणाऱ्या पट्ट्यात, देशातील राजस्थान व इतर पट्ट्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण कमी उत्पादनाला कारणीभूत आहे. तसेच तुरीवर इम्पोर्ट ड्यूटी वाढलेली असल्याने ती आयातही करणे महागात जाते. मात्र बाजारात डाळींची मागणी सध्या जास्त आहे. त्यामुळे सध्य़ा तूरडाळीचा दर ७० ते ७२ रुपये प्रति किलोवरून ८० ते ८५ रुपये प्रति किलोवर आहे. तुर, मूग डाळींचे भाव आगामी काळात यापेक्षाही जास्त कडाडू शकतात.

डाळ हा आहारातील प्रथिनांचा मुख्य स्त्रोत आहे.सलग दुष्काळ आल्याने मागील तीन वर्षांपुर्वी राज्यात तूरीचे दर गगनाला भिडले होते. त्यावेळी राज्य सराकरने हे दर आवाक्यात आणण्यासाठी आयातही सुरु केली. होती. त्यानंतर दोन वर्षांपुर्वी राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन घेण्यात आले. त्यामुळे बाजारात तुरीच्या डाळीची उपलब्धता वाढली होती. घाऊक बाजारात तूर डाळीचे दर ५० रुपयांपर्यंत कमी झाले होते.