दुर्दैवी ! फोटो काढण्यासाठी दोघांनी गमावला जीव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील जोगेश्वरी येथून विरार पूर्व येथील भाटपाडा येथे बाईक राईडसाठी गेलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुडालेल्या दोघाही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाचे जवानांना यश आले आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ग्रुपमधील मंगेश राणे ( 25) आणि सूर्यकांत सुवर्णा (34) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

मुंबई – जोगेश्वरी हिंद नगर कॉलनी येथील 10 जणांचा ग्रुप विरार पूर्वेतील भाटपाडा येथील तलावावर आला होता. त्यावेळी मंगेश आणि सूर्यकांत हे दोघे तलावाच्या काठावर फोटो काढत असताना पाय घसरून पाण्यात पडले. दोघेही बुडू लागल्याने इतर तरुणांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळाने पोलिस आणि अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत पाण्यात बुडाल्याने दोघांचाही मृत्यू झाला होता.

दरम्यान, कोरोना आपत्तीमुळे वसई-विरारमधील पर्यटनबंदी पालघर जिल्हा प्रशासनाकडून घोषित करण्यात आली आहे. त्यानंतरही मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक वसई-विरारमध्ये पर्यटनासाठी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पर्यटनबंदी असतानाही अनेक तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यंदाच्या कोरोना आपत्तीतही घडल्या आहेत.