धक्कादायक ! ‘होम क्वारंटाईन’ होण्यावरुन झालेल्या वादात दोघांची हत्या, लातूर जिल्ह्यातील रविवारी पहाटेची घटना

लातूर : मुंबईला जाऊन राहणारा व नुकताच गुजरातहून ट्रक घेऊन आलेल्यास होम क्वारंटाईन होण्यास सांगितल्यावरुन नातवाईकांमध्ये झालेल्या वादात दोघांची हत्या करण्यात आली. निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे रविवारी पहाटे अडीच वाजता ही घटना घडली.
शहाजी पाटील आणि त्यांचा पुतण्या वैभव पाटील अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. शत्रुघ्न पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी निलंगा पोलिसांनी विद्यमान बरमदे व त्यांच्या ६ नातेवाईकांवर  गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यमान बरमदे हा नेहमी मुंबईला राहणारा आहे. तो ट्रक घेऊन गुजरातला गेला होता. तेथून तो परत गावात आल्यावर बोळेगावचे शत्रुघ्न पाटील यांनी बरमदे याला होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला. त्यावरुन बरमदे व पाटील यांच्यात वाद झाला होता. दरम्यान बरमदे हा होम क्वारंटाईन न होता़ शेजारी चांदोरी गावातील आपल्या बहिणीकडे गेला होता. तेथून तो रविवारी पहाटे परत आला. त्यावेळी पाटील व बरमदे या कुटुंबात वाद झाला. त्यात बरमदे कुटुंबांनी शहाजी पाटील व वैभव पाटील यांच्यावर वार करुन त्यांची हत्या केली. शत्रुघ्न पाटील हेही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले असून गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले.