दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही : अब्दुल सत्तार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जोपर्यंत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असे आव्हानच राज्याचे महसूल व ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार (Revenue and Rural Development Minister Abdul Sattar) यांनी दिले आहे.

धुळ्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिवसेना मेळाव्यात मंत्री सत्तार यांनी भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंना लक्ष्य केले आहे. भाजपाचे राजकारण म्हणजे मुँह मे राम बगल मे सुरी असंच आहे, राम मंदिराच्या नावाखाली भाजपाचे राजकारण सुरू असल्याचे सत्तार म्हणाले. तसेच, आगामी ग्रामपंचायत निवडणुका ह्या केवळ निवडणुका नसून भाजपाल धडा शिकवण्याची संधी असल्याचे समजून कामाला लागा, असे आवाहनही सत्तार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्याचा उच्चार करत, ते म्हणाले पण परत आलेच नाही, असे म्हणत फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचे भाजपा नेत्यांकडून खासगीत कौतुक केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर, महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेने त्यांना मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे.