शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आश्वासन, म्हणाल्या – ‘फी न भरल्यामुळं एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत शिक्षण संस्थांनी विद्यांर्थ्यांची शाळेची फी न घेता पालकांना सवलत द्यावी, असे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिले आहे. मात्र, राज्य सरकारचे आदेश डावलुन काही शाळांनी फी वाढ करत पालकांकडे फीसाठी तगादा लावल्याच्या तक्रारी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्यांनी फी न भरल्यामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

राज्य शासनाचे आदेश डावलून बोरिवली पश्चिम येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुलसह अनेक शाळांनी फी वाढ केलेली आहे. तसेच काही शाळा फी भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावत आहेत. फी न भरल्यास ऑनलाईन वर्गात बसण्यास मुलांना येथील शाळा परवानगी देत नाहीत. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिवसेना व युवासेना सिनेट प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली.

यावेळी सदर शांळांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी शिवसेना शिष्टमंडळास दिल्याची माहिती आमदार विलास पोतनीस यांनी दिली.

उत्सव काळात परिक्षेचे वेळापत्रक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आल्या, महाराष्ट्रातील मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सव कालावधीत वास्तविक शाळांना सुट्टी देण्यात येते. मात्र, दादर येथील सेंट पॉल हायस्कूलने सत्र परीक्षेचे वेळापत्रक उत्सव काळात जाहिर केल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पालकांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून त्यांनी तक्रारीची दखल घेतली आहे.

आमदार विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीची दखल शिक्षणमंत्र्यांनी घेतली असून त्यांनी त्वरीत कारवाईचे निर्देश दिल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.