..तर मी घरातच बसलो असतो ; विराटने दिलं गंभीरला उत्तर

चेन्नई : वृत्तसंस्था – सध्या लोकसभा आणि आयपीएल दोन्ही एकत्र सुरु झालं आहे. त्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला गौतम गंभीरने मैदानावरची बॅटींग सोडून राजकारणात बॅटींगचा निर्णय घेतला आहे. विराट हा रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यासारखा चलाख कर्णधार नाही, असं गंभीरने म्हटलं होते. त्यावर जर मी असा विचार केला तर मला घरी बसावं लागेल, असं विराटने म्हटलं आहे.

नक्कीच तुम्हाला आयपीएल जिंकायचं असतं आणि मी तेच करतोय, ज्याची माझ्याकडून अपेक्षा केली जाते. मी आयपीएल जिंकलो किंवा नाही जिंकल्यामुळे माझ्यावर जी टीका केली जाते, त्याची मी चिंता करत नाही. तुम्ही कोणत्याही मर्यादा निश्चित करु शकत नाही. मी माझ्यावतीने सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. मलाही आयपीएल जिंकावं वाटतं, पण कधी कधी असं होऊ शकतं, असं विराटने सांगितलं.

आपल्याला या बाबतीत व्यावहारिक व्हायला हवं. दबावात निर्णय घ्यावे लागल्यामुळे असं झालं. जर मी बाहेर बसलेल्या लोकांसारखा विचार केला तर मी पाच सामनेही जिंकू शकत नाही आणि मी आतापर्यंत घरी बसलो असतो, असं विराटने सांगितलं. दरम्यान, विराट कोहली हा चलाख कर्णधार नाही, त्यामुळे त्याची तुलना रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनीसोबत केली जाऊ शकत नाही. धोनी आणि रोहित शर्माच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी तीन-तीन वेळा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवलाय, असं गंभीर म्हणाला होता. त्यावर विराटने उत्तर दिलं आहे.