आषाढी एकादशी : दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला होता तब्बल 6 वेळा श्री विठ्ठलाच्या महापुजेचा मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  प्रथमच इतिहासात आषाढ महिन्यात पंढरपूरमध्ये संचार बंदी लागू करण्यात आली आली असून, या संचारबंदीत मुख्यामंत्र्यांचा लवाजमा मात्र महापूजेसाठी येणार आहे. संचारबंदीत शासकीय महापूजा होण्याची सुद्धा ही इतिहासातील पहिलीच वेळ. प्रतिवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरात १० ते १२ लाख भाविक दाखल होतात. पण यावर्षी कोरोना संसर्गाचे संकट लक्षात घेता भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी घातली आहे. यामुळे इतिहासात पहिल्यांदाच संचारबंदी व लाखो वैष्णवांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब शासकीय महापूजा करणार आहेत. मात्र, आजतागायत सर्वाधिक वेळा ही महापूजा करण्याचा मान दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे जातो. त्यांना सहा वेळा हा मान मिळाला आहे. मुख्यमंत्री आषाढीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करुन राज्याच्या भल्यासाठी साकडे घालतात.

विलासराव देशमुख यांच्यानंतर शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येकी चार वेळा श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा मान मिळाला आहे. तसेच राज्याबाहेरील मुख्यमंत्री दिग्वीजय सिंह यांना दोनदा तर राज्यपाल म्हणून शंकरदयाळ शर्मा, सी. सुब्रमण्यम यांना प्रत्येकी एक वेळा मान मिळाला. तर मुख्यमंत्री म्हणून मारोतराव कन्नमवार, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे यांना प्रत्येकी एकदा मान मिळाला. मात्र पी. के. सावंत, वसंतदादा पाटील, बॅ. ए. आर. अंतुले, सुधाकर नाईक आणि बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री पदावर असताना एकदा देखील पूजेची संधी मिळाली असल्याचा उल्लेख नाही. सन १९६० ला प्रांत आर. डी. शिंगरे यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचा मान मिळाल्यानंतर सन १९६१ व ६२ मधील पूजे संदर्भात समितीकडे माहिती नाही.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत उल्लेख नाही. तर दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी सन १९६३ साली मुख्यमंत्री म्हणून पहिल्या पूजेचा मान मिळाल्याचा उल्लेख श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे आहे. १९६४ ला सोलापूरचे सहायक जिल्हाधिकारी पु. स. पाळंदे यांनी पूजा केली. तर राजरामबापू पाटील यांना सन १९६५ ला महसूलमंत्री असताना व सन १९७९ ला ग्रामविकास मंत्री असताना पूजेचा मान मिळाला. सन १९६६ मधील पुजेबाबत नोंद नाही. सन १९६७ मध्ये भाऊसाहेब वर्तक यांना पुरवठा मंत्री असताना, सन १९६८ कल्याणराव पाटील, सन १९६९ ला बाळासाहेब देशमुख यांना महसूलमंत्री असताना तर सन १९७० व ७१ ला आबासाहेब पारवेकर यांना माहिती खात्याचे राज्यमंत्री असताना पूजेचा मान मिळाला. १९७२ साली दुष्काळामुळे शासकीय पूजा झाली नाही. तर सन १९७३,७४,७५ ला देवस्थानचे पंच यांच्यावतीने पूजा करण्यात आली.

सन १९७६ ला मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, सन १९७७ ला मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून शालिनीताई पाटील, सन १९७८ ला विधानसभेचे उपसभापती गजानन गरुड, सन १९७९ ला ग्रामविकास मंत्री राजारामबापू पाटील, सन १९८० ला माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी परिवहन व कामगार मंत्री असताना पूजा केली. सन १९७७ व १९८१ ला मुख्यमंत्री वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटील महसूलमंत्री यांनी पूजा केली. सन १९८२ ला माणिकराव भामले यांनी पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री असताना, सन १९८३ बाबत माहिती उपलब्ध नाही. सन १९८४ ला नानाभाऊ एवंडवार कृषिमंत्री असताना पूजा केली. सन १९८५-८६ बाबत माहिती उपलब्ध नाही. सन १९८७ ला डॉ. शंकर दयाळ शर्मा आणि सन १९९१ ला सी. सुब्रमण्यम यांनी राज्यपाल असताना पूजा केली. सन १९८८ ते १९९३ असे चार वेळा शरद पवार यांना मुख्यमंत्री असताना पूजेचा मान मिळाला.

सन १९९२ ला छगन भुजबळ यांना महसूलमंत्री असताना पूजेचा मान मिळाला. सन १९९४ ला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री दिग्वीजय सिंह यांना राज्याचे पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासोबत तर १९९७ ला राज्याचे मुख्य सचिव दिनेश अफझलपूरकर यांच्या सोबत असा दोनदा पूजेचा मान मिळाला. सन १९९५, ९६, ९८ ला युतीचे सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांना पूजेचा मान मिळाला. त्यानंतर सन १९९९ ला नारायण राणेंना मुख्यमंत्री असताना मान मिळाला. सन २००० ते ०१ आणि सन २००५ ते ०८ असे तब्बल सहा वेळा विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री असताना मान मिळाला. सन २००२, ०४, ०९ बाबत माहिती उपलब्ध नाही. तर सन २००३ ला सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री असताना पूजेचा मान मिळाला. सन २०१० ला अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री म्हणून तर सन २०११ ते २०१४ अशी सलग चार वर्षे मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांना पूजेचा मान मिळाला. सन २०१५ ते २०१७ अशी तीन वर्षे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री असताना पूजेचा मान मिळाला.

२०१८ ला देवेंद्र फडणवीस यांना मराठा आंदोलनाचा फटका बसला त्यामुळे त्यांना पंढरपुरात येत आले नाही त्यावेळी त्यांनी मुंबईतील वर्षा बंगल्यावर श्री विठ्ठलाची मूर्ती चौरंगांवर मांडून पूजा केली. त्यानंतर चौथ्यांदा २०१९ ला पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पूजा केली.