‘…तरच मोदींनी पाकशी चर्चेची संधी गमावू नये’ : राज ठाकरे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानी विमानांनी बुधवारी भारतीय वायुसनेच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी विमाने पळवून लावली. यानंतर मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये, असे आवाहन केले आहे. शिवाय पाकिस्तान जर चर्चेला तयार असेल तर त्यांनी आधी वैमानिकाला सोडावं असंही त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर, जर पाकिस्तान चर्चेला तयार असेल तर पहिलं पाऊल हे पाकिस्ताननं उचलावं असंही ते म्हणाले.
गुरुवारी राज ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध  केले या पत्रकात त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. त्या पत्रकात राज ठाकरे म्हणाले की,”पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचं केलेलं आवाहन माझ्या पाहण्यात आलं. अशा प्रकारचं आवाहन त्यांनी पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतरही केलं होतं. या हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई सेनेने जो हल्ला चढवला तो आवश्यक होता. त्याबद्दल मी भारतीय हवाई दलाचं अभिनंदन देखील केलं होतं. काल पुन्हा इम्रान खान यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे आणि इतकंच नव्हे तर त्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यापासून सर्व मुद्द्यांवर चर्चेत तयारी दर्शवली आहे. अशा प्रकारे चर्चेतून मार्ग काढण्याची संधी स्व. अटलबिहारी वाजपेयीजी आणि परवेझ मुशर्रफ यांच्या काळात आली होती. अटलजींनी सदा-ए-सरहद ही लाहोरपर्यंतची बससेवा सुरू केली. समझौता एक्स्प्रेस सुरू केली.”
पुढे राज ठाकरे म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये . पाकिस्तानची खरंच चर्चेची तयारी असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल हे त्यांनीच उचलायला हवं. त्यांनी वैमानिक अभिनंदन यांना तात्काळ सोडलं पाहिजे आणि सीमारेषेवरचा गोळीबार त्वरीत थांबलाच पाहजे. जर या गोष्टी घडल्या तरच म्हणता येईल इम्रान खान यांचे हेतू स्वच्छ आहेत आणि तसं घडलं तर पंतप्रधान मोदींनी ही संधी गमावता कामा नये” असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
इतकेच नाही तर पुढे ते असेही म्हणाले की, “आग्र्यात ऐतिहासिक चर्चा झाली. पण दुर्दैवानं ह्या चर्चा पूर्णत्वाला जाऊ शकल्या नाहीत. जी संधी अटलजींच्या काळात दोन्ही देशांच्या हातातून निसटली आहे ती संधी पुन्हा आपल्यासमोर आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया ही दोन कट्टर शत्रूराष्ट्र चर्चेतून मार्ग काढण्यासाठी पुढे येऊ शकतात तर आपण का नाही येऊ शकत? युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल आणि काश्मिरी जनता देखील भरडली जाईल. हे कोणालाच परवडणारं नाही.अतिरेक्यांना ठेचलेच पाहिजे आणि ते देखील निष्ठुरपणे म्हणून युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून राजकीय फायदा पण कोणी घेऊ नये. दोन्ही देशांत ज्या समस्या आहेत त्यावर चर्चेतून मार्ग काढावा आणि दोन्ही देशांत शांततेचं वातावरण निर्माण व्हावं हीच इच्छा आहे.”