‘राजांना आम्ही काय सांगणार’, मराठा आरक्षणावरील प्रश्नावरुन शरद पवारांचा टोमणा

तुळजापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यावर अतिवृष्टीचं मोठं संकट आलं असून यात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. कधी आलं नाही असं संकट राज्यावर आलं आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मदत करण्यासाठी पुढं आलं पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते तुळजापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिकेबाबत विचारण्यात आले. यावर बोलताना त्यांनी दोन्ही राजेंना टोमणा मारला.

मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या परिसराची पाहणी करण्यासाठी शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. उस्मानाबादनंतर आज तुळजापूर येथील दौऱ्यादरम्यान, पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. राज्यपाल, एकनाथ खडसे, शेतकऱ्यांना मदत, अतिवृष्टी यासह अनेक मुद्यांवर शरद पवार यांनी भाष्य केलं. यावेळी भाजपा नेते आणि खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिकेविषयी विचारण्यात आले. या दोन्ही नेत्यांकडून राज्यात एक आणि दिल्लीत वेगळं बोललं जात असल्याचा प्रश्न विचारला. त्यावर पवारांनी मार्मिक उत्तर दिलं. त्यांना प्रश्न कोण विचारणार ? राजांना आम्ही काय सांगणार, ते प्रजेचं काम नाही, असे म्हणत पवार यांनी दोन्ही राजांना टोमणा मारला.

शहाण्याला शब्दांचा मार
अमित शहांनी राज्यपालांबद्दल केलेल्या या विधानाचा संदर्भ देत शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारींवर जोरदार टीका केली. राज्यपालांनी वापरलेल्या भाषेवर सर्वच स्तरातून टीका झाली. इतक्या टीकेनंतर आत्मसन्मान असलेली व्यक्ती त्या पदावर राहणार नाही. पण आपण आपल्या पदाची प्रतिष्ठा जपायचीच नाही, असं एखाद्याने ठरवलंच असेल तर काय करणार ? अशा शब्दात पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. मराठीत एक म्हण आहे, शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.