हिंगणघाटनंतर नाशिकमध्ये महिलेला 4 तरुणांनी रॉकेल टाकून पेटवलं

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगणघाट आणि औरंगाबादची घटना ताजी असतानाच अशाच प्रकारची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये एका विधवा महिलेला चार तरुणांनी रॉकेल टाकून पेटवून दिले. ही घटना लासलगाव बस स्थानकावर घडली असून महिलेला पेटवून दिल्यानंतर तरुण घटनास्थळावरून पळून गेले.

नाशिकच्या लासलगाव बस स्थानकाच्या परिसरात ही घटना घडली आहे. चार ते पाच तरुणांनी या विधवा महिलेला गाठून तिला शिवीगाळ केली. तसेच तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. महिलेला पेटवल्यानंतर तरुण तेथून पसार झाले. स्थानिकांनी वेळीच धाव घेत आग विझवली. या महिलेला स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महिला 40 टक्के भाजली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. पीडित महिला ही लासलगाव जवळील पिंपळगावाजवळील एका गावात राहणारी आहे. या महिलेवर लासलगाव येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हिंगणघाट प्रकरणामुळे राज्यासह देश हादरून गेला आहे. या घटनेत पीडित मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर महाराष्ट्रासह देशातून यावर संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणातील नराधमाला तात्काळ शिक्षा करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यातच आता नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.