…यामुळे युवकांना नोकरी व सरकारला मनुष्यबळ मिळेल, रोहित पवारांनी सुचवला ‘पर्याय’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. या मुळे राज्यातील सर्व उद्योगधंदे ठप्प असल्याने राज्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही मोठे आर्थिक निर्णय घेतले आहे. त्यानुसार राज्यात कोणत्याही प्रकारची नवी नोकरभरती होणार नाही. तसेच यावर्षी कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येणार नाही. एवढेच नाही तर सध्या सुरु असलेली सर्व कामे स्थगित करण्याचा निर्णय राज्याच्या अर्थमंत्रालयाने घेतला आहे.

दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला एक पर्याय सुचवला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करून राज्य सरकारला पर्याय सुचवताना म्हटले आहे की, कोरोनामुळे आलेल्या वित्तिय संकटामुळे सरकारने यंदा नोकरभरती रद्द केली, पण वयाच्या अटीमुळे अेक युवा एज बार होतील. त्यामुळे सरकारने भरती रद्द न करता एक वर्षासाठी मोफत सेवा/किमान वेतन द्यावे. यामुळे युवकांना नोकरी व सरकारला मनुष्यबळ मिळेल. याला युवा सहकार्य करतील, असा विश्वास वाटतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

तसेच लॉकडाऊन शिथिल होत असतानाच परराज्यातील अनेक कामगार, मजूर स्वगृही जात आहेत. परराज्यातील या कामगारांअभावी उद्योग-व्यवसाय सुरु करण्यात अडचण येऊ शकते. पण हे कामगार परत गेल्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा मराठी मुलांनी उठवावा. आजच्या संकटात कोणतेही काम कमी दर्जाचे समजू नये, असेही रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

रोहित पवारांनी कापसू शेतकऱ्यांबाबत एक ट्विट केले असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ते म्हणाले, CCI कडून होणारी कापूस खरेदी बंद होणार नाही तर गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बाजर समित्यांकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी घारून जाऊ नये. याबबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.