… ‘पण काळजावर झालेली जखम कधीच भरून येणार नाही’, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम २४ तास आमचे पोलीस बांधव करत असतात. अशा पोलिसांचा मला अभिमान आहे, जे स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख, दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख, दु:खात सामील होतात. पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून, त्यांच्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व करणारच आणि हे वचन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना मांडल्या. महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयात आयोजित हुतात्मा दालनाच्या उद्घाटन व कॉफी टेबल बुक प्रकाशनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, शौर्याला वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. 26 नोव्हेंबर हा शौर्य दिन. या दिनी शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना वंदन व नतमस्तक. हा दिवस आपण कोणच विसरू शकत नाही. त्या दिवशी मी मुंबई बाहेर होतो. मुंबईतील घटना कळताच प्रथम विजय साळसकरांना फोन लावला. घटनेची माहिती देताना साळसकरांनी सांगितले की, मी आता घरी असून लगेचच घटनास्थळी जात आहे. काही वेळानी मी त्यांना पुन्हा फोन लावला, पण तो फोन उचलला गेलाच नाही, आणि ती दुर्दैवी घटना घडली. आज त्या घटनेला बारा वर्षे झाली, यापुढेही कित्येक वर्षे उलटतील; पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरून येणार नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.

अगदी नक्षलवादी अतिरेक्यांपासून ते भुरट्या चोरांपर्यंत सर्वांना पकडणारा हा आमचा पोलीस एक महत्त्वाचा घटक आहे. तो सुदृढ राहिला पाहिजे आणि त्याला सुदृढ ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढे अतिरेकी महाराष्ट्र, मुंबईवर हल्ला काय पण मुंबईचे नाव पण घेऊ शकणार नाहीत, त्यांना धडकी भरेल असे आपण पोलीस दलाचे भक्कम सक्षमीकरण करू. तसेच पोलिसांची कामे जनतेपर्यंत पोहोचवू. त्यासाठी अशा हुतात्मा दालनाची संकल्पना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच महाराष्ट्रात सर्वत्र राबविण्यात यावी. देश-विदेशातही पोलीस व लष्करी प्रशिक्षणाची व्यवस्था शालेय जीवनापासून सुरू करण्यात येते, असे बोलताना त्यांनी सिंगापूरचे उदाहरण दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, पोलिसांवरील हल्ला ही अत्यंत चुकीची बाब असून, त्यांच्या कर्तव्याचा आपण आदर केला पाहिजे.

अप्रतिम कॉफी टेबल बुक
अतुल्य हिंमत या पुस्तकात पोलिसांनी युक्ती आणि शक्तीचा वापर करून कोरोना काळात केलेल्या कामगिरीचा दस्तावेज आहे. हे पुस्तक अप्रतिम आहे. या पुस्तकाकडे मी मुख्यमंत्री, नागरिक आणि कलावंत अशा तिन्ही भूमिकांमधून पाहत आहे. या कॉफी टेबल बुकमध्ये अतिशय सुबक मांडणी व सुयोग्य सादरीकरण करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या अप्रतिम बुकच्या निर्मितीबद्दल मुख्यमंत्र्यांकडून पोलीस महासंचालकांचे अभिनंदन करण्यात आले.