महाराष्ट्रातील मजूरांसाठी ST बस धावल्याने 3000 जणांची ‘घरवापसी’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे अनेक राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिक व मजुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पायी जाणार्‍या मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाउनमध्ये विविध ठिकाणी अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील नागरिक आणि मजुरांना घरी पोहोचवण्याचे काम सुरू केले असून एसटीमुळे तीन हजार जण सुखरुप घरी पोहोचले आहेत.

लॉकडाउननंतर परराज्यातील कामगारांनी घराचे रस्ते धरले होते. त्याचप्रमाणे इतर राज्यात असलेल्या महाराष्ट्रातील कामगारांनीही राज्याची वाट धरली. प्रवासी वाहतुकीची कोणतीही सोय नसल्यामुळे अनेक जण पायी निघाल्याचे दिसून आले. त्यानंतर औरंगाबाद-जालना दरम्यान झालेल्या मजुरांच्या अपघातानंतर राज्य सरकारने परराज्यात अडकलेल्या मजुरांना घरी आणण्यासाठी पावले उचलली आहेत.

राज्याच्या सीमेवर अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील 3 हजार मजूरांना एसटीमुळे सुखरुपणे घरी पोहोचता आले. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याविषयी माहिती दिली. आज (10 मे) राज्याच्या सीमेवर अडकलेल्या महाराष्ट्रातील तीन हजारांवर मजुरांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुखरुप पोहोचवण्यात आले आहे. या सर्व प्रवासात सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्यात आले होते. राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारातून 250 बसेसच्या साहाय्याने महाराष्ट्रात अडकलेल्या पाच हजार मजुरांना राज्याच्या सीमेवर सुखरुप सोडण्यात आले आहे. या बसेस नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर विभागातून सोडण्यात आल्या होत्या, अशी माहिती परब यांनी दिली.