शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर होणार ? CM ठाकरे केंद्र सरकारशी चर्चा करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने अलिकडेच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागातील शिक्षण तज्ज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमुन या धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वर्षा निवासस्थानी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यंत्र्यांनी आज जाणून घेतले.

राज्याला काही बदल कारावे लागतील

नव्या धोरणात अनेक नव्या संकल्पना आहेत. त्या दृष्टीने राज्य सरकारला कायद्यातही अनेक बदल करावे लागतील. काही आवश्यक आणि अनिवार्य बदल स्वीकारावेच लागतील तर जे स्वीकारले जाऊ शकत नाही किंवा त्यात काही अडचणी आहेत तर त्याबाबतही विचार करावा लागेल. त्यादृष्टीने या धोरणांची सध्या केवळ घोषणा करण्यात आली आहे. यासाठी तज्ञांचा गट स्थापन करुन या धोरणाच्या संदर्भात विचार करणे योग्य ठरेल. यामध्ये तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण तसेच मातृभाषेतून शिक्षण, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होईल तसेच ते जास्तीत जास्त प्रश्न विचारु शकतील असा प्रस्तावित शैक्षणिक ढांचा यावर सखोल चर्चा करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जानेवारीपासून शैक्षणिक वर्षाबाबत चर्चा

कोरोना परिस्थितीमुळे सध्या सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. शिक्षण क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. राज्यात काहीही झाले तरी 100 टक्क विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन, ऑफलाइन व जसे शक्य असेल तसे शिक्षण मिळालेच पाहिजे. शिक्षण विभागाने यातील सर्व उणिवा, अडथळे दूर करावेत. शिक्षकांची उपस्थिती कशी आहे ते तपासावे, विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात काय अडचणी येत आहेत त्या तात्काळ पहाव्यात असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, नेहमी जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होते. मात्र सध्याचा काळ पाहता जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष सुरु करता येते का त्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली.