यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमी आवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अतिशय किरकोळ कारणावरून रेखा यांची निर्घृण हत्या झाल्याचे समजते.

पुणे येथून रेखा जरे अहमदनगरला आपल्या गाडीने निघाल्या होत्या, वाटेत जतेगावच्या घाटात हल्लेखोरांनी त्यांचा खून केला. गंभीर जखमी झालेल्या आवस्थेत त्यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले असता, डॉक्टरांनी त्या मृत झाल्या असल्याचे सांगितले.

असे म्हटले जात आहे की, घाटात गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद खूनापर्यंत पोहचला. आरोपीसोबत बाचाबाची झाल्यानंतर त्याने रेखा यांच्यावर धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास पोलीस करत असून खूनाचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. ही घटना समजताच सर्वत्र खळबळ उडाली आहे.