क्रोर्याची परिसीमा ! अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह सापडला

समस्तीपूर (बिहार) : वृत्तसंस्था – हैदराबाद, बक्सर येथील बलात्काराच्या घटनांनी देश हादरुन गेला आहे. या घटना ताज्या असतानाच बिहार मधील समस्तीपूर येथे अत्याचाऱ्याच्या क्रोर्याची परिसीमा गाठणारी घटना उघडकीस आली आहे. वारीसनगर येथे एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून संबंधीत महिलेची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

समस्तीपूर जिल्ह्यातील वारीसनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोही पंचायतच्या दरदरी चौर येथे आज सकाळी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. वारीसनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रसुंजय कुमार म्हणाले, या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. या महिलेचा अन्य ठिकाणी खून झाला असावा आणि तिची ओळख लपविण्यासाठी मृतदेह दरदरी चौर येथे आणून जाळण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना घडली असून यामध्ये सीआरपीएफचा जवान आणि निवृत्त तुरुंगाधिकाऱ्याच्या मुलाचा समावेश आहे. अशाच प्रकारची घटना मंगळवारी बक्सर येथे घडली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा दिलमानी मिश्रा म्हणाल्या, विहारमधील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे प्रशासन महिलांप्रती गंभीर नसल्याचे दिसून येते.

Visit : Policenama.com