चंद्रकांत पाटलांचा भूजबळांना इशारा, म्हणाले -‘जामिनावर सुटला आहात, निर्दोष नाही, जोरात बोलू नका, महागात पडेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपला जनतेनं नापसंत केले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अन्न व नागरी पूरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आक्रमक झाले आहेत. यावर बोलताना पाटील यांनी भुजबळांनाच इशारा दिला आहे. छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर ईव्हीएम योग्य आहेत आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चुकीच्या आहेत, असे होत नाही. बंगालच्या पराभावाचे दु:ख वाटणारच कारण आम्ही कोणतीही गोष्ट कार्यकर्ता म्हणून करत असतो. आम्ही निवडणुका गांभिर्याने घेत असतो. बंगालमध्ये पराभव झाला असला तरी भाजपच्या विरोधात सगळे एकवटले होते. हे लक्षात घेतले पाहिजे. वर्षानुवर्षे सरकारमध्ये असलेले नाही च्या बरोबरीने दिसत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात डाव्यांनी आणि काँग्रेसने मत टाकली. देशात भाजप विरुद्ध सगळे अशी स्थिती आहे. भाजप विजयी झाला की प्रामाणिकपणे कारभार करणार आणि तुमची प्रकरणं बाहेर काढणार याची भीती असते. त्यामुळे काहीही करुन बंगालमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवा हाच फंडा त्याठिकाणी चलला असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

काय म्हणाले भुजबळ
ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या. मै अपना बंगाल नही दूंगी अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. मोदी आणि शहा यांनी एक दिवसाआड सभा घेतल्या. त्यांचे अनेक मंत्री बंगालमध्ये ठाण मांडून बसले होते. मात्र याचा काही उपयोग झाला नाही, असे भूजबळ म्हणाले. तसेच आसाम वगळता भाजपला कुठेच साथ मिळाली नाही. देशात भाजप विरोधी प्रचंड लाट आहे. अशा काळात निवडणूक झाली तर भाजप नावालाही सापडणार नाही. पंढरपूरची पोट निवडणूकीचा निकाल गट तट आणि इतर स्थानिक राजकारणामुळे लागत आहे. त्यावरुन देशाचा कल बांधता येणार नाही, असेही भूजबळ म्हणाले होते.