शरद पवार, सोनिया गांंधी आणि ठाकरे सरकारवर टीका करताना भाजपा आमदाराची जीभ घसरली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामींना अटक (Arnab Goswami) केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला असून, ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. विशेष म्हणजे गोस्वामी प्रकरणात टीका करताना योगेश सागर (Yogesh Sagar) यांची जीभ घसरली आहे. शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि ठाकरे सरकारवर त्यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर ही त्यांनी निशाणा साधला आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खटले सुरू असून, त्यांच्यावरही योगेश सागर यांनी गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे भाजपा आमदार आशिष शेलारांनीही (Ashish Shelar) ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातल्या प्रेससाठी काळा दिवस असल्याचे शेलार म्हणाले आहेत. एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक केली. सरकारविरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले आहे. आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या… वा रे वा लोकशाही सरकार! काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस… महाराष्ट्र आणीबाणीच्या दिशेने?, असा टोलाही आशिष शेलारांनी लगावला आहे. दरम्यान, 2018 मध्ये अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?

अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक (84) त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते.