शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील प्रश्न सोडवायची जबाबदारी आघाडी सरकारची आहे. जनतेने नाकरलेलं असताना तीन पक्ष स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. जर तुम्हाला प्रश्न सोडवता येत नसतील तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा, असं सुजय विखे पाटील यांनी म्हणत आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. लोणी गावात माजी मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज एल्गार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार सुजय विखे पाटील देखील सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी आघाडी सरकारची आहे. प्रत्येकवेळी केंद्रावर आरोप करणं चुकीचं असून जर केंद्र सरकारवरच अवलंबून राहणार असाल तर तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार केलेच कशाला ? असा सवाल सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी मागणी सुजय विखे यांनी केली आहे.
तर कोरोना का थांबला नाही ?
संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेलं वक्तव्य निंदनीय असून आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांचा संजय राऊत यांनी अपमान केला आहे. त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी मागणीही खासदार सुजय विखेंनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि डॉक्टरांपेक्षा आपण आणि आपला पक्ष जर हुशार आहात तर कोरोना का थांबवला नाही ? असा खरमरीत सवाल त्यांनी केला आहे.