मोदी सरकारचा मोठा निर्णय ! शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकरने आजच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर मिळण्याबाबत निर्णय घेतला आहे. सरकारने १४ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित केली असून कोरोना संकटकाळातही शेतकऱ्यांनी धान्य पिकवले आहे. शेतकरी अडचणीच्या काळातही थांबला नाही, असे म्हणत कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले. १४ खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीत वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना खर्चापेक्षा ५० ते ८३ टक्के अधिक उत्पन्न मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आज काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत जे निर्णय घेण्यात आले, त्यांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नरेंद्र तोमर आणि नितीन गडकरी यांनी दिली. तोमर यांनी सांगितले की, ‘मक्याची किमान आधारभूत किंमत ५३ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. तूर, मूग यांची आधारभूत किंमत ५८ टक्क्यांनी वाढवली गेली आहे.’ तसेच १४ पिकांच्या किमतीत ५० ते ८३ टक्क्यांची वाढ केली असल्याचेही तोमर यांनी सांगितले.

ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते, ती परत करण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. शेतकऱ्यांना ऑगस्टपर्यंत कर्जाची परतफेड करता येईल. तसेच कोरोना संकटकाळातही शेतकऱ्यांनी मोठे उत्पादन केले. यापैकी ३६० लाख मेट्रिक टन गहू, १६.०७ लाख मेट्रिक टन डाळ सरकरने खरेदी केली असल्याचेही तोमर यांनी सांगितले.