राज्यात 4 दिवसानंतर पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी 4 दिवसांनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच सध्या फक्त कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस पावसाठी अनुकूल वातावरण नसल्याने जोरदार पावसाची शक्यता सध्या नाही. सध्या अरबी समुद्राहून येणारे वारे कमकुवत आहेत तसेच दक्षिणेकडून येणार्‍या वार्‍यांना जोर नसल्याने पुढील चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता नाहीत. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मागील 24 तासात राज्यात मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. गिरना 60, मालेगाव 30, अहमदनगर, पारोळा, श्रीरामपूर 20, अमळनेर, इगतपुरी, पुणे (पाषाण), सिंधखेडा 10 मिमी तर मराठवाड्यातील औरंगाबाद 60, अंबड 50, लोहा 40, बदनापूर, गंगापूर, हिमायतनगर 30, आष्टी, भोकरदन, बिलोली, उमारी 20, कळमनुरी, मुदखेड, परभणी, सोयेगाव, वैजापूर 10 मिमी पाऊस पडला़ विदर्भात नागपूर 60, कामठी 40, हिंगणा, पारशिवनी, संग्रामपूर 20, अकोला, अकोट, भिवापूर, चांदूर बाजार, चिखलदरा, चिमूर, हिंगणघाट, कुही, मारेगाव, पवनी, रामेटक, सिंधखेड राजा, उमरेड, वर्धा 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुढील चार दिवस सध्या आहे अशीच स्थिती राहणार असून चार दिवसानंतर पावसाचा जोर वाढू शकतो. अरबी समुद्रावरुन येणारे वारे कमकुवत असल्याने या वार्‍यांमुळे कोकणातच काही ठिकाणी पाऊस पडत आहे. पुढील चार दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. 26 ते 27 जून रोजी नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच 28 व 29 जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.