धक्कादायक ! महिलांच्या भांडणात बालकाचा मृत्यु

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – लहान मुलांच्या भांंडणातून कधी कधी मोठ्यांमध्ये जोरदार भांडणे होतात. त्यातून काहींची डोकी फुटतात. वसमत तालुक्यातील वापटी येथे रविवारी लहान मुलांच्या भांडणावरुन त्यांच्या आयांमध्ये भांडणे झाली. त्यात ९ महिन्यांचा बालक जमिनीवर पडल्याने जबर जखमी होऊन त्यात त्याचा दुदैवी मृत्यु झाला. स्वराज शिंदे (वय ९ महिने) असे मृत्यु पावलेल्या मुलाचे नाव आहे.

याप्रकरणी वसमत पोलिसांनी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती अशी, वापटी येथे लहान मुलांची काही कारणावरुन भांडणे झाली. त्यावरुन तणाव निर्माण होऊन या मुलांच्या आया आपापल्या मुलाची बाजू घेऊन भांडू लागल्या. मीराबाई शिंदे यांच्या कडेवर ९ महिन्यांचा स्वराज होता. भांडणात महिला एकमेकींना धक्काबुक्की करत होत्या. तेव्हा मीराबाई यांना ढकलून दिल्याने त्यांच्या कडेवरील स्वराज जमिनीवर पडून जखमी झाला. त्याला वसमत येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला.

लहान मुलांच्या भांडणातून झालेल्या हाणामारीत एका चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –