महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली ‘सर्कस’ सुरु आहे, राजनाथ सिंह यांची ठाकरे सरकारवर घाणाघाती टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. कोरोनाच्या संकटात जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगले नाही. शरद पवारांच्या हाती या सरकारची सुत्रं आहेत तरीही असं घडतं आहे ही बाब आश्चर्य वाटण्याजोगी आहे, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले. महाराष्ट्रात सरकार नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे का ?  महाराष्ट्र कोरोना बाबतीत आता चीनला मागे टाकेल अशी भीती व्यक्त होत आहे. या सगळ्याला सरकारची अकार्यक्षमता म्हणायचं का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या जनसंवाद कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते.

महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय नाही
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, आम्ही कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. सहकार्य करतो आहोत. तरीही या सरकारला कोरोनाग्रस्तांच्या संख्येवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही ही बाब दुर्दैवी असल्याच राजनाथ सिंह यांनी म्हटले. या सरकारमध्ये काहीही समन्वय नाही. राजकारण समाजाच्या सेवेसाठी केले जाते. राजकारण हे स्वार्थासाठी केलं जात नाही असेही त्यांनी म्हटले.

ही तर काँग्रेसची जुनी परंपरा
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून त्यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला. राहुल गांधी म्हणतात, आम्ही महाराष्ट्रात सरकारमध्ये आहोत पण आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. हे तर संकटाच्या काळात पळ काढणं झालं. जबाबदारी झटकणं झालं. जबाबदारी झटकून टाकणं ही तर काँग्रेसची जुनी परंपरा असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

सोनू सूदवरून शिवसेनेवर निशाणा
सोनू सूदच्या मुद्यावरून शिवसेनेवर निशाणा साधताना राजनाथ सिंह म्हणाले, अभिनेता सोनू सूद लोकांना चांगली मदत करतोय तर शिवसेनेला तेही बघवत नाही. त्याच्यावरही टीका करण्यात आली. शिवसेनेला काय झालंय ? आम्ही पहात होतो ती बाळासाहेबांची शिवसेना हीच आहे का ? असा प्रश्न आम्हाला पडलाय. आमच्यासोबत शिवसेनेने विधानसभेची निवडणूक लढवली त्यानंतर आम्हाला धोका दिला. आम्हाला धोका दिला हरकत नाही मात्र आम्ही कोणालाही धोका देऊ शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.