केंद्राच्या योजनेत फक्त तांदूळ, केशरी कार्डधारकही लाभार्थी नाहीत : CM

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेत फक्त तांदूळ वाटपाचा समावेश आहे. जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यांनाच तांदूळ मिळणार असून केशरी कार्डधारकांना केंद्राने या योजनतेतून वगळलं आहे, अशी माहिती देताना राज्य सरकारकडून मात्र मध्यमवर्गीयांनाही 8 रुपये प्रति किलो दराने तीन किलो गहू आणि 12 रुपये प्रति किलो प्रमाणे तांदूळ दिले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे केंद्र सरकारने मोफत धान्य वाटप करायला सांगून देखील राज्य सरकार धान्य वाटप करत नसल्याच्या भाजपच्या आरोपाची हवाच निघून गेली आहे.

राज्यात पुणे आणि मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. राज्यातील लॉकडाऊनला मंगळवारी चार आठवडे झाले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यातील नगारिकांना मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचे त्यांनी आभार मानेल.

यावेळी बोलताना त्यांनी मोफत अन्नधान्य वाटपावरून होत असलेल्या भाजपच्या आरोपांमधील हवा काढून टाकली. केंद्राच्या योजनेत केवळ तांदूळ मोफत वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे तांदळाचे वाटपही सुरु झालं आहे. मात्र, केंद्राने केवळ दारिद्र्य रेषेखालील लोकांनाच मोफत तांदूळ वाटप करण्यास सांगितले आहे. त्यात केशरी कार्डधाराकांचा समावेश नाही. त्यामुळे याचा लाभ मध्यमवर्गीयांना मिळत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. असे असताना सर्वजण अडचणींचा सामना करत असताना नागरिकांना गहू 8 रुपये प्रति किलो तर तांदूळ 12 रुपये प्रति किलो दराने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.