पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील लोकसभेचा उमेदवार ३ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवाराची अर्ज भरण्याची तारीख तर ठरली आहे मात्र अजून उमेदवार काही ठरलेला दिसत नाही. मी पुण्यासाठी दोन नावे सुचविली आहेत. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील उमेदवारीबाबात माहिती दिली. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “मोठ्या शहरांमध्ये आम्हाला खूप अपयश आले. भाजपचे वातावरण असल्याने शहरी भागात भाजपचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे शहरी भागात निकराची लढाई लढणार आहोत. मी पुण्यासाठी दोन नावे सुचविली आहेत. लवकरच नाव जाहीर होईल. पुण्याचा उमेदवार लवकर जाहीर करण्यात येईल आणि ३ एप्रिलला उमेदवार अर्ज भरणार आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “गेल्या पाच वर्षांत मोदींची काम करण्याची पद्धत पाहिली तर त्यांची हुकुमशाही वृत्ती दिसून येते, नोटाबंदी, शेतकऱ्याबाबतचे धोरण, संस्था नष्ट करण्यात आल्या. मोदींच्या ताब्यात संस्था गेल्या आहेत. हुकुमशाहीकडे प्रवास त्यांचा असून, निम्मा प्रवास झाला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत व संविधान राहणार नाही. पुन्हा निवडणुका होणार नाहीत या माझ्या विधानावर मी आजही कायम आहेत. आम्ही यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्यावेळी आम्ही म्हटले नव्हते. लोकशाहीच्या संस्था तोडून टाकल्या असून, लोकशाहीचा अपमान होत आहे.”