सत्ता गेल्यापासून भाजप महाराष्ट्रावर सूड उगवतोय, काँग्रेसचा घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कंगना राणौतने केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सत्ता गेल्यापासून भाजपनं वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेवर सूड उगवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी कलाकारांचा अपमान करणाऱ्या कंगना राणौतला भाजपनं पाठिंबा देणं हा याचाच भाग आहे. त्याबद्दल भाजपने राज्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

बॉलिवूडच्या बदनामीविरोधात आवाज उठविणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर कंगनाने अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसने कंगनाच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले की, उर्मिला मातोंडकर यांनी महाराष्ट्राचं नाव देशात मोठं केलंय. अ‍ॅवॉर्ड विनिंग कामगिरी केली आहे. मध्यमवर्गातली एक मराठी मुलगी नाव कमावते याचा आम्हाला अभिमान आहे. भाजपला तो नसेल. त्यांनी कंगनाच्या बाजूनं उभं राहायचं ठरवलं असेल तर महाराष्ट्र त्याला निश्चितच विरोध करेल. महाराष्ट्राच्या मायभगिनींचा अवमान आम्ही सहन करणार नाही, असे सावंत यांनी म्हटले आहे.

भाजपवर टिका करताना सावंत म्हणाले, जी कंगना महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचा अपमान करते. 107 हुतात्म्यांचा अपमान करते. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करते. त्या कंगनाला वाय सिक्युरिटी दिली गेली. तिला झाशीची राणी ठरवलं गेलं. राज्यपालांशी तिची भेट घडवून आणली गेली. हे सगळं भाजपच्या इशाऱ्यावर आणि स्क्रीप्टनुसार झालं, असा आरोप सावंत यांनी केला आहे.

सावंत यांनी पुढे म्हटले की, भाजपनं गेल्या सहा वर्षात महाराष्ट्रात अपमान करण्याची, महाराष्ट्राला कमी लेखण्याची एकही संधी सोडली नाही. अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात आले. आता बॉलिवूडही बाहेर घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरु करणं हे भाजपचं लक्ष्य आहे. भाजपकडून मराठी कलाकारांचा अवमान झाला. त्यांच्या आर्थिक स्थितीची हेटाळणी करण्यात आली हेही लोकांसमोर आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.