देशातील तरुणांना चंद्राची नाही तर पोटाची काळजी : राहुल गांधी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – इस्त्रोची सुरुवात काँग्रेसने केली, मात्र आम्ही कधी त्यांच्या कामावर बोललो नाही. आम्हाला सर्वसामान्यांचे प्रश्न मिटवायचे होते. मात्र, हे सरकार कायमच चंद्रयान मोहिमेवर बोलत आहे. देशातील युवकांना चंद्रावर जाण्यापेक्षा पोटाची काळजी जास्त आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. हे सरकार मुळ मुद्यांना बगल देण्यासाठीच कलम 370 आणि चंद्रयानसारख्या गोष्टींचा गाजावाजा करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी भाजपवर केली आहे.

बेरोजगारी, कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. भारतात आज कोणालाही विचारा जनतेचा प्रश्न काय आहे. यावर लगेच उत्तर मिळेल, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची अवस्था. मोदींनी वाटोळे केले असे प्रत्येक शेतकरी म्हणत आहे. पण, माध्यमांमध्ये बेरोजगारी आणि शेतकऱ्यांविषयी एक शब्दही येत नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते औसा येथे बसवराज पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. मोदी नागरिकांना सांगत आहेत चंद्राकडे बघा, तिकडे चालला आहे.

इस्त्रोचा फायदा मोदी घेत आहेत. चंद्रावर गेल्याने देशातील युवकांच्या पोटात अन्न जाणार नाही असा टोला देखील त्यांनी मोदींना लगावाला. आम्ही (काँग्रेस) कायम सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर बोलतो आणि त्यावर काम करत आलो. मात्र, सरकार हे सर्व सोडून फक्त लोकांचे लक्ष भरकटवण्याचे काम करत आहे. देशात सध्या दोन हजारांपेक्षा जास्त कारखाने बंद पडले आहे. अनेक लोक बेरोजगार झाले आहे.

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावतील चुकांमुळे देशाची आर्थिक स्थिती खालावली आहे. भविष्यात यापेक्षा वाईट वेळ येणार आहे. बँका बुडत चालल्या आहेत. या सरकारने श्रीमंतांना पाठीशी घतलं, तर सर्वसामान्यांना लटलं आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

Visit : Policenama.com