सत्तेत आल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीनं ‘जे’ केलं ‘तसं’ काँग्रेसनं करावं, मिलिंद देवरांचं सोनिया गांधींना ‘लेटर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांनी मिळून बनलेलं महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारला स्थापन होऊन पन्नास दिवस झाले आहेत. मात्र काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मागण्यांची पूर्तता अद्यापही झालेली नसल्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आश्वासनांची पूर्तता होण्यासाठी एखादी समिती नेमावी अशी मागणी केली आहे.

निवडणुकीत पक्षाने दिलेल्या आश्वासनाबाबत भारतीय नागरिक सुज्ञ झाला आहे. अनेकांनी पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे. अशा प्रकारच्या गोष्टींची आठवण देवरा यांनी पत्रातून करून दिली आहे. तसेच सत्तेवर येताच शिवसेनेने त्यांचा अजेंडा राबवायला सुरुवात केली आहे आणि जनता देखील त्या निर्णयाचे स्वागत करत आहे.

मार्च २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी मुंबईत केलेल्या भाषणात गरिबांना ५०० स्क्वेअर फूट घरं देण्याचं आश्वासन दिलं होतं. किमान समान कार्यक्रमात याचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईतील मतदार नेहमी काँग्रेसवर विश्वास ठेऊन असतो. १९८४ पासून काँग्रेसने मुंबईकरांना परवडणारी घरं देण्याचं काम केलं आहे. म्हणूनच काँग्रेसनेही आपल्या अजेंड्याची पूर्तता करण्यासाठी एका समितीची स्थापना करावी अशी मागणी मिलिंद देवरा यांनी पत्राद्वारे केली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार हे संविधानाच्या चौकटीत राहूनच काम करेल असे उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींना लिहून दिले असल्याचे अशोक चव्हाण यांनी एका भाषणात सांगितले होते. मात्र आम्ही असे काहीही लिहून दिले नाही मात्र महाविकास आघाडी सम समान कार्यक्रमाच्या आधारे काम करेल असे स्पष्टीकरण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर महाविकास आघाडीतील सरकारच्या तिन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले.

त्यामुळे आता मिलिंद देवरा यांनी लिहिलेल्या पत्राला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी काय उत्तर देतात किंवा या पत्रानंतर काँग्रेस कशा प्रकारे आपला अजेंडा राबवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.